"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, December 10, 2017

अनामवीरा-४

4. शशिभूषण रायचौधुरी ऊर्फ शशिदा


शिक्षक आणि शेतकरी यांच्या प्रमाणे नवनिर्मितीचं मूलभूत काम क्वचितच अन्य समाजघटक करत असतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही या दोन्ही घटकांचे अनन्यसाधारण योगदान आहे. 

तसंही क्रांतिकारक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शस्त्र परजून ब्रिटिश राजवटीवर चालून जाणारा युवक येतो, जो नंतर फासावर बलिदान देतो; पण वैचारिक क्रांती, शस्त्रहीन असूनही जाज्वल्य देशाभिमान जोपासणे, नि:शस्त्र राहून अखंड कार्य करीत राहणे अशा गोष्टी आपल्या लेखी कदाचित क्रांती या घटकात मोडणाऱ्या नाहीत, म्हणून आपण अशांना समाजसुधारक, विचारवंत म्हणतो पण अशांनीही आपले जीवन राष्ट्रयज्ञाच्या बलिवेदीवर समर्पित केल्याने आणि क्रांती कार्यातील आपला वाटा उचलल्याने मी त्यांनाही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकच म्हणेन. आणि अशांपैकीच थोडी वेगळी वाट चोखाळणारे एक अल्पपरिचित क्रांतिकारक म्हणजे बंगाल प्रांतातील शशिभूषण रायचौधुरी उर्फ शशिदा! 

आठ जानेवारी १८६३ ला बराकपूरच्या जवळील तेघारिया गावी सौदामिनी देवी आणि आनंदचंद्र या प्रतिष्ठित दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला शशिभूषण हा त्या दाम्पत्याचा सगळ्यात लहान मुलगा. स्वतः सोडेपूर उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतानाच शशीने गरीब घरातील मुलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली. अशा मुला-कुटुंबांना अन्यथा ख्रिश्चन धर्मप्रसारक हेरत असत. कालांतराने शशिभूषणने प्रौढांसाठीचे सायंकालीन वर्ग सुरू केले त्यातून बंगाली भाषा, इतिहास, गणित या बरोबरीने विणकाम, शेती, रेशीमकिड्यांची पैदास अशा प्रकारचे जीवनोपयोगी प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्तीही केली. 

१८८० ला कलकत्त्याच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युशनची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे पुढचे शिक्षण सुरू झाले. तिथले संचालक ईश्वरचंद्र विद्यासागर आणि शिक्षक म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, खुदीराम बोस (हुतात्मा नव्हे) अशांचा सहवास लाभला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी योगेंद्र विद्याभूषणला इटालियन क्रांतिकारक मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे आपल्या भाषणातून प्रसिद्ध करायला सांगितली होती. शिवाय कॉलेजमध्ये चंडीदास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक प्रशिक्षणाचा तास चालत असे. अशा वातावरणात शशिभूषण शांत राहणे शक्यच नव्हते. आनंदमोहन बसूच्या सहकार्याने शशीने विद्यार्थी संघटना सुरू केली. शशी नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन शरीरसाधना करीत असे. पारंपरिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी तो स्वामी विवेकानंदांना भेटल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. स्वामी विवेकानंदांच्या ‘व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ या विचारांनी शशिभूषणच्या जीवनाची दिशा निश्चित केली. 

१९०० ला कलकत्यात अनुशीलन समितीसाठी काही चारित्र्यवान आणि सक्षम तरुणांची मागणी शशिभूषणकडे करण्यात आली. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शशिदाने सतीश मुखर्जी, निबारण भट्टाचार्य, इंद्रनाथ नंदी, निखिलेश्वर राय मौलिक, जतींद्रनाथ मुखर्जी असे युवक पाठवले. 

याच सुमारास रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन आकार घेत होते. ६ जानेवारी १९०२ ला शिक्षकांच्या पहिल्या तुकडीत शशिदा सहभागी झाले. मार्च १९०२ ला शशिदा कलकत्त्याला परतले ते अनुशीलन समितीच्या उद्घाटनासाठी. अनुशीलन समितीने शशिदांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमजीवी विद्यालय’ सुरू केले.

बंगालमधील थंडीच्या दिवसातील एक संध्याकाळ. हिवाळ्यामुळे अंधार लवकर झालेला. दिवेलागणी होऊन कचेऱ्यांतून लोक आपापल्या घरी परतत होते. ठिकठिकाणच्या कालिमाता मंदिरांतून घंटानाद आणि सर्बमाँगल माँगल्ये शिबे सर्बार्थसाधिके या श्लोकाचे स्वर अनुनादित होत होते आणि पारंपारिक वेशातले बंगाली स्त्री पुरुष बाजारहाट करायला बाहेर पडले होते. त्याचवेळी ‘श्रमजीवी विद्यालय’ गॅसबत्त्या-कंदील यांनी उजळून गेले होते. कामकरी वर्गातील गरीब घरातील स्त्री पुरुष हातात कंदील घेऊन विद्यालयात येत होते. तिथे केवळ अक्षरओळख अथवा साक्षरता हे लक्ष्य नसून येणाऱ्या प्रौढांना साबण बनवणे, शिवणकाम, उदबत्त्या बनविणे, विणकाम, मातीची भांडी बनविणे असे रोजगाराभिमुख प्रशिक्षणही दिले जात होते, बाजारात त्या उत्पादनांची विक्री करणारे ‘छात्र भंडार’ होते ज्याची जबाबदारी नंतर अमरेंद्रनाथ चॅटर्जी यांनी घेतली .

१९०४ च्या अखेरीस शशिदा बिहारमधील मुंगेरला गेले. तिथे निमधारी सिंह आणि अन्य प्रांतीय नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘आदर्श विद्यालय’ सुरू केले. १९०५ मध्ये ते ओरिसाला गेले आणि त्यांच्या प्रेरणेतून उत्कलमणी गोपालबंधू दास यांनी शारीरिक व सांस्कृतिक शिक्षण देणारे केंद्र भुवनेश्वरला चालू केले. १९०९ला ‘सत्यवादी विद्यालय’ सुरू झाले.

शशिदांचे अनुशीलन समितीतील सहकारी सशस्त्र क्रांतीचा मार्ग समांतर रीतीने चोखाळत होतेच पण अलीपूर बॉम्ब खटल्यानंतर सरकारने क्रांतिकारी संघटनांना त्वेषाने दडपायला सुरुवात केली. १९०९च्या सुमाराला रासबिहारी बोस यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर आहे असा सुगावा लागल्याने शशिदांनी रासबिहारींना डेहराडूनला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. शशिदा स्वतः दौलतपूर कॉलेजच्या हॉस्टेलचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. शशिदा, उपप्राचार्य महेंद्रनाथ सेठ, विद्यार्थी नेता भूपेंद्र कुमार दत्ता हे तिघेही एकत्र राहात असत. पुढे १९१७ ला तिघांनाही एकत्रच अटक करण्यात आली; पण तत्पूर्वी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शारीरिक व्यायाम, कसरत, योग-ध्यान, निवडक वाचन, देव देशभक्तीपर गीते यासाठी तरुण एकत्र जमत असत. बाघा जतीन (ज्यांचे चरित्रही आपण या अनामवीरा मालिकेत कालांतराने पाहणार आहोत) सुद्धा १९११पासून आपल्या प्रवासात या कॅम्पसला आवर्जून भेट देत असत. त्यांच्या प्रेरणेने तरुण घोडेस्वारी, पोहणे, लष्करी कवायत हेही करू लागले १९१३ च्या सुमारास दामोदर नदीला भीषण पूर आला. जनजीवन विस्कळीत झाले. शशिदांनी स्वयंसेवक दल बनवून बाघा जतिनच्या नेतृत्वाखाली दामोदर नदी पूरग्रस्त सहाय्यतेसाठी पाठवून दिला . 

या सर्व कालावधीत म्हणजेच १९१० ते १९१५ मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार कलकत्त्यात होते. वैद्यकीय शिक्षण घेत होते. ते अनुशीलन समितीचेही सदस्य होते. दामोदर नदी पूरग्रस्त सहायतेसाठी तेही गेले होते, त्यामुळे स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन शशिभूषण रॉयचौधुरी तरुणांना जमवून सकाळी आणि संध्याकाळी जे शारीरिक बौद्धिक प्रशिक्षण देत असत त्याचा पूर्ण परिणाम डॉक्टर हेडगेवारांनी १९२५ ला स्थापना केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर दिसून येतो त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील कार्याचे प्रत्यक्षातील क्रियान्वयन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने झाले व संघशाखा त्याचे मूर्तस्वरूप ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये .

१९१५ ला बाघा जतिनच्या हौतात्म्याने शशिदा व्यथित झाले आणि अधिक गतीने सेवा कार्य त्यांनी सुरू केले. १९१७ ला ब्रिटिश सरकारने शशिदांना अटक केली पण त्यांना झालेला टीबी लक्षात घेता सरकारने त्यांची पत्नी ऊर्मिला देवी, मुलगी राणी आणि दुर्गा आणि मुलगा अशोक यांच्यासह आधी दौलतपूर आणि नंतर खुलना येथे त्यांना स्थानबद्धतेत ठेवले. १९१९ ला सुटका झाल्यानंतर ते तेघारिया येथे परतले. त्यांच्या शाळेचा दर्जा सुधारणे, मलेरियाबाबत जनजागृती करणे या कामाला त्यांनी जुंपून घेतले. अखेर एप्रिल १९२२ला मृत्यूने गाठेपर्यंत त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले .

Sunday, December 3, 2017

अनामवीरा - ३

3. बसंत कुमार बिस्वास



“बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए” । हा आनंद सिनेमातला डायलॉग आपल्याला आठवत असेल. हा डायलॉग प्रत्यक्ष जगलेला, उणंपुरं २० वर्षांचं आयुष्य लाभलेला बसंत कुमार बिस्वास हा आहे आजचा अनामवीर! 


महाराष्ट्र, बंगाल, पंजाब म्हणजे क्रांतिकारकांसाठी सुपिक भूमीच जणू. स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशांपासून प्रेरणा घेऊन क्रांतिकार्यासाठी जीवन समर्पण करणारे हजारो युवक प्रांतोप्रांती तयार झाले. वधस्तंभावर जाणारा एक युवक म्हणजे पुढच्या कित्येक वीरांसाठी प्रेरणा. ६ फेब्रुवारी १८९५ ला बंगालमधील नादिया जिल्ह्यातील पोरगछा या ठिकाणी मतिलाल आणि कुंजबाला बिस्वास या दाम्पत्याच्या पोटी बसंतचा जन्म झाला. दिगंबर बिस्वास आणि मन्मथनाथ बिस्वास अशा क्रांतिकारकांच्या घराण्यात जन्मल्यामुळे त्याच्याही धमन्यांतून क्रांतीचे रक्त न खेळते तरच नवल! गावातल्याच शाळेत त्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली पण पुढे बसंत जवळच्याच माधवपूर नावाच्या गावातील शाळेत जाऊ लागला जिची स्थापना प्रख्यात समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक गगनचंद्र बिस्वास यांनी केली होती . पुढे १९०६ ला मुरगच्चा शाळेत त्याचा प्रवेश झाला जिथे खिरोधचंद्र गांगुली हे मुख्याध्यापक होते. खिरोधचंद्राच्या मार्गदर्शनाखाली बसंतचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास सुरू झाला. आणि पुढे मग रासबिहारी बोस यांच्या संपर्कात आल्यानंतर बसंतचे शस्त्रास्त्रे व स्फोटके यातील प्रशिक्षण सुरू झाले. रासबिहारी त्याला बिशे दास अशी प्रेमळ हाक मारत असत.

१९११ ला किंगजॉर्ज पंचम याचा भारतप्रवास होता आणि राजधानी म्हणून कलकत्त्याऐवजी दिल्लीची घोषणाही झाली होती. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग कलकत्त्याहून दिल्लीत आला होता. त्याचा स्वागतसमारंभ होता. तो दिवस होता, २३ डिसेंबर १९१२.  दिल्लीच्या चांदणी चौकात मोठीच सजावट करण्यात आली होती. सर्वत्र रोषणाई केली गेली होती. फुलांच्या माळांची आरास लक्ष वेधून घेत होती. आणि एका सजवलेल्या गजराजाचे आगमन झाले. मऊ झूल पांघरलेल्या त्या हत्तीवरच्या हौद्यात लॉर्ड हार्डिंग व त्याची पत्नी बसले होते. अन्याय आणि जुलूम यांची परकीय राजवट असली तरी आत्मविस्मृत भारतीय कसे स्वत्व विसरून आपले जंगी स्वागत करत आहेत ही मौज पाहण्यात हार्डिंग दाम्पत्य मग्न होते. आजूबाजूच्या आत्मशून्य गर्दीत एका तरुणीची तीक्ष्ण व भेदक नजर चहूबाजूंना फिरत होती. बरोबरच्या तरुणाबरोबर तिची नेत्रपल्लवीही चालली होती. तो क्षण आला आणि त्या तरुणीने हार्डिंगच्या दिशेने बाँब भिरकावला. बाँबसुद्धा गद्दार निघाला! त्याने अभागी माहुताचा बळी घेतला पण हार्डिंग दाम्पत्य बचावले. चार्ल्स हार्डिंगला जखमा झाल्या. हत्ती बावचळून गेला. सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. काही क्षणांपूर्वीच्या समारंभमग्न चांदणी चौकाचे स्वरूप एकदमच बदलून गेले. जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. याच गर्दीचा फायदा घेऊन ती तरुणी व तिचे सहकारी निसटले. ती तरुणी म्हणजेच पौरुषत्वाचे दर्शन घडविणारा पोरसवदा बसंत होता! त्याच्याबरोबरचा साथीदार म्हणजे मन्मथनाथ बिस्वास! आणि या कटाचे योजक सूत्रधार होते रासबिहारी बोस.
 

सर्व क्रांतिकारकांनी कमालीची गुप्तता बाळगली. पण ब्रिटिशांनी हा हल्ला मनाला लावून घेतला. त्यांनी बारकाईने तपास सुरु केला. सहभागी लोकांची नावे सांगणाऱ्यांना मोठी इनामे जाहीर करण्यात आली. पण हाताशी काहीच लागत नव्हते. गंमतीचा भाग म्हणजे त्यादिवशी रासबिहारी बोस त्या गर्दीतून निसटून रेल्वेने डेहराडून ला येऊन आपल्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट मधे दाखल झाले. आणि काही महिन्यांनी लॉर्ड हार्डिंग ची भेट डेहराडून ला त्यांच्या कार्यालयात असताना त्याच्या सन्मानार्थ मेजवानीचेही आयोजन त्यांनी केले. त्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून हार्डिंग सहीसलामत वाचल्याबद्दल ईश्वराचे आभारही मानले गेले! पण फंदफितुरीचा शाप लागलेल्या समाजाविरुद्ध लढणे सोपे असते. ब्रिटिशांना हळूहळू सुगावा लागत होता.

बसंतच्या मागावर पोलीस लागले. बसंत पोलिसांना गुंगारा देत होता पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करायला आलेल्या बसंतला २६ फेब्रुवारी १९१४ ला पोलिसांनी बरोबर पकडले. पोलीस आज ना उद्या आपल्यालाही पकडणार ही खात्री झाल्याने रासबिहारी चंदननगर ला स्थलांतरित झाले. तिथे भूमिगत राहिल्यानंतर एप्रिल १९१५ ला ते जपानला निघाले. 

इथे २३ मे १९१४ ला दिल्ली-लाहोर कटाचा खटला सुरु झाला. ५ ऑक्टोबर ला बसंत ला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अमीर चरिध, अबधबिहारी आणि बालमुकुंद या तिघांना त्याच खटल्यात फाशीची शिक्षा फर्मावली गेली. ‘ब्रिटिशांचे शासन छान होते हो, त्यांची न्यायव्यवस्था वाखाणण्यासारखी होती’ असे उमाळे आजही दाटून येणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यांनी पुढील घटनाक्रम लक्षात घेण्याजोगा आहे. 

बसंतला फाशीची शिक्षा न होता जन्मठेपेची झाली. त्यामुळे फाशीसाठी आग्रही असणाऱ्या सरकारने लाहोर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी बसंत हा अल्पवयीन असल्याची वास्तविकता बदलण्यासाठी अंबाला सेंट्रल जेलमधील रेकॉर्ड्स बदलण्यात आले. बसंत होता त्यापेक्षा २ वर्षांनी मोठा असल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार त्यावर आरोपनिश्चिती करून त्याला दोषी ठरवून पंजाब मधल्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये ११ मे १९१५ ला फाशी देण्यात आले. विसाव्या वर्षी धीरोदात्तपणे वधस्तंभावर जाणारा बसंत हा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढयातील सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी एक ठरला. 

आज आम्ही बसंतला विसरलो असू, पण जपानच्या टोकियो शहरात तेत्सुकोंग हिओची गार्डन या उद्यानात रासबिहारींनी बसवलेला बसंतचा पुतळा पहायला मिळतो. नादिया या त्याच्या जन्मठिकाणी मुरगच्चा स्कूल आणि सुवेंदु मेमोरियल ट्रस्ट ह्या ठिकाणी तसेच रबीन्द्रभवन ऑडिटोरियम, कृष्णनगर इथे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारके आहेत. 

संसदेच्या म्युझियममध्ये मात्र त्यांचे तैलचित्र लावायला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा कार्यकाळ उजाडावा लागला. आमच्या पाठ्यपुस्तकात बसंतच्या वाटयाला किती ओळी आणि त्याही कधी येतील हे कुणालाच सांगता यायचे नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे एक छोटीशी पणती आपले जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या अनामवीर बसंतच्या स्मृतिसाठी!